राजाराम पूल बंद करणार्‍या ठेकेदाराची पालिकेच्या नोटीशीला केराची टोपली   

पुणे : कोणतीही पूर्वसूचना न देता राजाराम पूल अचानक बंद केल्याने सिंहगड रस्त्यावर सात ते आठ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीस जबाबदार कोण याचा खुलासा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने हा पूल बंद करणार्‍या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीला तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ठेकेदाराने महानगरपालिकेच्या या नोटीशीला केराची टोपली दाखविली आहे.
 
पालिकेकडून मुळा मुठा नदीवरील पूल बांधून अनेक वर्ष झालेली आहेत. त्यामुळे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हे पूल सुरक्षित केले जात आहेत. यासाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त केला आहे. राजाराम पुलावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी प्रशासनाने ठेकेदाराला परवानगी दिली होती. त्यानुसार ठेकेदाराने वाहतूक पोलिसांकडे अर्ज केला. वाहतूक पोलिसांनी त्यास परवानगी दिल्यानंतर ठेकेदाराने प्रकल्प विभागाला व पोलिसांना पूर्व सूचना न देता सोमवारी सकाळी आठ वाजता सिंहगड रस्त्यावरून कर्वे रस्त्याकडे जाणारी पुलावरील रस्ता बंद केला. त्यामुळे या भागात प्रचंड कोंडी झाली. सिंहगड रस्त्यावर सुमारे सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे काम करण्यापूर्वी राजाराम पूल बंद केलेबाबतचे कोणतेही जाहीर फलक लावण्यात आलेले नाहीत. या करणास्तव संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्याबाबत खात्यास देखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे नोटीसमध्ये नमूद करुन काँक्रीट कंपनी लिमिटेड या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यास आली होती.
 
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीला पुणेकर चांगलेच त्रासले आहेत. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र ठेकेदारांच्या चुकीमुळे तसेच मध्ये रस्ता खोदला जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अचानक रस्ता वाहतूकीसाठी बंद केल्याने या भागातील नागरिकांना संताप व्यक्त केला होता. हजारो वाहने तीन ते चार तास अडकून पडली होती. पालिका अधिकार्‍यांकडे तक्रार गेल्यानंतर राजाराम पुलावर कोणतेही काम करण्याची परवानगी दिली नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ठेकेदाराने परस्पर रस्ता बंद करून काम सुरु केला असल्याचे सांगण्यात आले. तो पर्यंत तीन ते चार तास नागरिक कोंडीत अडकून पडले होते. याप्रकरणाची पालिकेच्या प्रकल्प विभागाने दखल घेत ठेकेदारास खुलासा करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली.
 
राजाराम पूल बंद करण्याबाबतची कोणतीही कल्पना ठेकेदाराने पालिकेला दिली नव्हती. त्यामुळे या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. तीन दिवसात लेखी खुलासा करणे आपेक्षित होते. मात्र अद्याप कोणताही लेखी खुलासा आलेला नाही. खुलासा आला की नाही, याबाबतची खात्री करुन पुढील कार्यवाही संबंधित ठेकेदारवर केली जाईल.

- संदीप पाटील, कार्यकारी अभियंता,प्रकल्प विभाग, महापालिका 

 

Related Articles